नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादात पतीने थेट पत्नीलाच संपवले आहे. बाहेरगावी कामासाठी येण्यास नकार दिल्याने वाद होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची कोयत्याने वार करत हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यात असलेल्या कऱ्हे येथील ललिता म्हाळू गांगुर्डे (वय २२) ही तिच्या आईकडे आली होती. ललिता आई गीता राजेंद्र पगारे (रा. देवळाने) हिच्या सोबत शेतमजुरी करून घराकडे येत असताना पती म्हाळू गोरख गांगुर्डे (वय २३, रा.शनी मंदिर सटाणा ह.मु.कऱ्हे) याने तिला रस्त्यात अडवून माझ्यासोबत बाहेरगावी कामास का येत नाही? अशी विचारणा केली आणि सोबत येण्याचा आग्रह धरला. परंतु ललिताने बाहेरगावी कामाला येण्यास नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन म्हाळू गांगुर्डे याने हातात असलेल्या कोयत्याने पत्नी ललिताच्या डोक्यावर, हातावर आणि पाठीवर सपासप वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली.
हल्ला केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या घटनेत पत्नी ललिता हिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती म्हाळू हा तिथून फरार झाला. या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मयताचा मृतदेह नामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले. पोलिसांना आरोपी म्हाळू एका डाळींबाच्या शेतात लपल्याचे समजले त्यानंतर सापळा रचून शेतातून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.