ताज्याघडामोडी

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ

नवविवाहित महिलेने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे घडली. सीमा संतोष जाधव असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित महिलेचे नाव आहे.

१९ वर्षीय सीमाचा विवाह काही महिन्यांपूर्वीच परभणीच्या जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे राहणाऱ्या संतोष जाधव याच्यासोबत झाला होता. २३ मार्च रोजी घरात असताना तिने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लाकडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावला.

याची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सीमाला उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी सीमाला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

सदरील घटनेची नोंद जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून नवविवाहित महिलेने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याबाबतचे कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे केहाळ गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासानंतर १९ वर्षीय नवविवाहित महिलेने आत्महत्या का केली याबाबतचे कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *