काका-पुतण्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील कोसारी या ठिकाणी ही घटना घडली. भावकीत विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा आरोप आहे.
विलास नामदेव यमगर (वय ४५ वर्ष) आणि प्रशांत दादासो यमगर (वय २३ वर्ष) असे मृत काका-पुतण्याची नावे आहेत. सामायिक विहिरीच्या पाण्यावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी यमगर ही भावकी राहते. त्यांच्या शेतामध्ये सामायिक विहीर आहे. या विहिरीतील पाण्यावरून सकाळी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला आणि यातून एका यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी विलास यमगर व प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला.
हल्ल्यामध्ये विलास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांचा खून करण्यात आला आहे, तर या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर जखमी झालेले आहेत.मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत. तर दुसऱ्या यमगर कुटुंबापैकी कोणी जखमी झाले नाही, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेतली आहे.