ताज्याघडामोडी

‘मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचं थेट सवाल

मुंबई, 01 जून : ‘आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यात गैर असं काहीही नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारवर टीका नक्की करा, पण वैयक्तिक टीका करू नये, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.

बारामती म्हणजे पवार कुटुंबीय आणि बारामती म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे हे समिकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

‘आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यात गैर असं काहीही नाही. राष्ट्रवादी पक्ष भविष्यात वाढावा हे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे, फक्त पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाहीये, तर हा पक्षाच एक कुटुंब आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

भविष्यात तुमचं राजकारण महाराष्ट्रात असणार का? असा सवाल विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी बारामतीतून निवडून आले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्यामुळे महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

तसंच, ‘राज्याच्या स्थैर्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करावे लागले. याआधी पुलोदचा प्रयोग झाला होता. लहानपणी बागुलबुवाची गोष्ट वाचली होती. त्याचा इतका गाजावाजा झाला की, बागुलबुवा येणार येणार अशी चर्चा झाली पण शेवट काही घडले नाही. उत्तरप्रदेश, गुजरात व्यतिरिक्त भाजपला इतर राज्यात सत्ता मिळवताना कठीण झाले होते. मध्यप्रदेशमध्ये तोडून फोडून सरकार स्थापन केले. जे काही चाणक्य वगैरे गप्पा मारण्यात आल्या त्याचा फुगा बंगालच्या निवडणुकीनंतर फुटला होता, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

“मला वडील शरद पवार आणि आई हे खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहे. ज्या आवर्जून लक्षात ठेवते. मी जेव्हा बारामती मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहेस, ती पायरी चढण्याची संधी तुला लाभली हे तुझं भाग्य आहे. बारामतीच्या लोकांमुळे ही संधी मिळाली आहे.  जेव्हा तू बारामतीकरांना विसरशील त्या दिवशी ती पायरी चढता येणार नाही, असा सल्ला बाबांनी दिला होता, तो मी कायम लक्षात ठेवते, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

तसंच, ‘महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही, हे वास्तव आहे, याची मला जाणीव आहे, असंही त्या म्हणाल्यात.

‘महाविकास आघाडी सरकार टिकेल की नाही, अशी सुरुवातील चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडीच्या कामाची दखल घेतली जात आहे. भाजपचे नेते उठसुठ टीका करत असतात, पण त्यांनी वैयक्तिक पातळीवर टीका नसावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *