ताज्याघडामोडी

रात्री जेवण करून बाहेर पडला अन् सकाळी मृतदेहच सापडला; तरुणासोबत नेमकं काय घडलं…

जळगावमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे जेवण करून घराबाहेर पडलेल्या मुलाची सकाळी थेट मृत्यूची माहिती आल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रमेश भास्कर नाडे (वय ३०) रा. राजीव गांधी नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या रमेश या तरुणाचा सोमवारी सकाळी मृतदेह सापडला. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राजीव गांधी नगरात रमेश भास्कर नाडे हा तरुण आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह भागवित होता.

रविवारी सायंकाळी ७ वाजता रमेश जेवण करून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याचे नातेवाईक यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही. सोमवारी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रेल्वे पूलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला.

या ठिकाणी पोलिसांनी मयताची ओळख पटविली असता, तो रमेश असल्याचे समोर आले. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे खाली झोकून रमेश याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे हरीश डोईफोडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *