आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नसणे ही, एखाद्यासाठी किती दुर्दैवाची गोष्ट असू शकते, याचा विचार तुम्ही करू शकतात. मात्र, अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये थंडीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा कथित थंडीमुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने भीक मागून तिचा अंत्यसंस्कार केला. पतीने आपल्या पत्नीचा मृत्यू थंडीमुळे झाला आहे. मात्र, दुसरीकडे हा मृत्यू थंडीमुळे झाला नसून अन्य दुसऱ्या कारणाने झाला आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
बंडा पोलीस ठाणे भागातील ढुकरी बुजुर्ग गावातील रहिवासी असणाऱ्या गंगाराम नावाच्या व्यक्तीची 48 वर्षीय पत्नी गीता देवी हिचा थंडीमुळे मृत्यू झाला. गंगाराम यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गंगारामची अवस्था एवढी वाईट आहे की तो घरात टिन शेड टाकून जगतो. त्याच्या घरात ना अंथरुण आहे ना पलंग.
गंगाराम आणि त्याची पत्नी जमिनीवर गवताच्या पेंढ्या पसरवून झोपायचे. सरकारी मदतीसाठी गंगारामने अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारल्या, पण मदत मिळू शकली नाही. गंगाराम हा शेतकरी म्हणाला की, तो खूप गरीब आहे. त्याच्याकडे ना रेशनकार्ड आहे, ना भांडी ना पलंग.
त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. पत्नीच्या मृत्यूनंतर गावातील लोकांकडून भीक मागून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.