राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आधीच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध सुरु आहे, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे.
ऋता आव्हाड यांनी नुकतेच एक ट्विट केले असून यासंबंधी माझ्याकडे खात्रीलायक माहिती असल्याचं त्यांनी म्हटलंय. ऋता आव्हाड यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रिदा राशीद यांनी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर 354 कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्यानंतर 376 अर्थात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिला तयार करण्याचा घाट घातला जातोय, असे ट्विट ऋता आव्हाड यांनी केलं आहे.
राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून याबद्दल ऋता आव्हाड यांनी विचारणा केली आहे.