ताज्याघडामोडी

लग्नाला मुलगी मिळत नसल्याचा घेतला गैरफायदा; एका आठवड्यात दोघांशी केलं लग्न

दोन दिवसांपूर्वी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने सोलापूरातील तरूणांनी नवरदेवाचा साज चढवून घोड्यावर बसून जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता बीडमध्ये लग्नाला मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एकाच मुलीचे एका आठवड्यात दोघांशी लग्न लावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पोलिसांनी या बनावट नातेवाईक टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये लग्न करून आलेल्या नव्या नवरीने दागिण्यासह धूम ठोकल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाणे आणि नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. बनावट आधार कार्ड, नातेही बनावट, आई-वडील आणि भाऊ हे देखील बनावट तर एजंट मार्फत हा लुटीचा खेळ चालत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अडीच लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. बीड जिल्ह्यात 8 दिवसात दोन बनावट लग्नाच्या घटना समोर आल्याने मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात नवरीसह 7 जणांना अटक केली. नवरी अल्पवयीन निघाली असून लग्नातील आई, भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे.

बीडमधील एका 32 वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्थामार्फत औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील तरुणीशी जुळवला होता. 3 डिसेंबरला वसमत येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लग्न उरकले. हे लग्न जुळवून देण्यासाठी मध्यस्थाने अडीच लाख रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या मीना बळीराम बागल हिच्यासोबत पलायनाचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर पोलीसांनी तपास करून आरोपींना पकडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *