ताज्याघडामोडी

शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची भव्य तयारी सुरू; अनेकांचे प्रवेश होणार

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात आता आपल्याकडे येण्यास अनेक जण उत्सुक असून, दसरा मेळाव्यात या सर्वांचे प्रवेश होतील,’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दसरा मेळाव्याची उत्सुकता अधिकच ताणली. त्याचवेळी, ‘मी फार काही बोलत नसताना, तुम्ही विनाकारण कशाला बोलता,’ असे सांगत पक्षातील वाचाळवीर मंत्र्यांना, तसेच आमदारांनाही त्यांनी समज दिली.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, याचाच भाग म्हणून दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीबाबत बुधवारी शिंदे गटाची बैठक वानखेडे स्टेडियमजवळील गरवारे क्लबमध्ये झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे, त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. यात सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘कालचा निकाल आपला उत्साह वाढवणारा आहे.

या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आता आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘त्यांच्या’ दसरा मेळाव्यापेक्षा जास्त ताकद आपल्या मेळाव्यात दिसली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजारांहून अधिक शिवसैनिक मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यासाठी ३५० बसेसचे नियोजन झाले आहे. मतदारसंघातून ५०० बसेसची मागणी होत असल्याचे सत्तार यांनी सांगितले. शिवसेना नेते रामदास कदम यांनीही बैठकीनंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले. ‘हा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुखांच्या परंपरेला साजेसा होईल.

सबंध देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं आहे. गर्दीचं नियोजन केलं जाईल, शक्तिप्रदर्शनाची आवश्यकता नाही. शिवेसना कुणाची हा निर्णय न्यायालयात लागण्याआधीच दसऱ्याला लागेल. ताकद असती तर ५० आमदार आणि खासदार सोडून गेले नसते. आता भाड्याने राष्ट्रवादीतून आलेल्यांना नेते-उपनेते करून आमच्या अंगावर सोडलं जात आहे,’ असा टोला कदम यांनी लगावला.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. ‘जाधव यांचे डोके सडलेले असून, तो बाडगा शिवसेना सोडून शरद पवारांकडे गेला आणि परत आला. बाडगे जास्त कडवट असतात,’ असेही ते म्हणाले. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी पक्षप्रमुख नेतेपद रिक्त ठेवले असल्याचे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *