राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातले. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. यानंतर नद्या, नाले ओसांडून वाहत आहेत. पर्यटकही या पावसाचा आनंद घेत आहेत. यातच आता हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान खात्याने काय म्हटलं –
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करत हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. काल जिल्ह्यातल्या 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पावसानं कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत, तर सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे.