गडचिरोली जिल्ह्यातील एका सरपंचाला 9 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 48 हजारांची लाच घेणाऱ्या चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती आणि एक सदस्य महिलेचा पती अशा सहा जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
काय संपूर्ण प्रकरण –
शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापकांकडून लाच मागण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 48 हजारांची लाच घेणाऱ्या चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती व एक सदस्य महिलेचा पती अशा सहाजणांना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अंजनगाव सुर्जी येथील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ अँड रेडियम आर्ट येथे सापळा रचत ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेले सर्वजण अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा येथील रहिवासी आहेत. मुऱ्हादेवी ग्रामपंचायत सदस्य दामोदर धुमाळे (वय 65), मनोज कावरे (43), लालदास वानखेडे (43), मोहम्मद इब्राहिम अब्दुल नबी (60) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्याचा पती शिवदास पखान (52) व उपसरपंच महिलेचा पती सुरेश वानखेडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
संबंधित प्रभारी मुख्याध्यापकाने शाळा इमारतीचे निर्लेखन करून लिलाव केला होता. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य दामोदर धुमाळे व लालदास वानखेडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ती तक्रार मागे घेण्याकरिता धुमाळे व वानखेडे हे 55 हजार रुपये लाचेची मागणी करीत होते. यासंबंधित तक्रार त्यांनी 13 सप्टेंबरला एसीबीकडे करण्यात आली. तर पडताळणीदरम्यान धुमाळे व कावरे यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच वानखेडे यांनी 8 हजार स्वीकारण्याचे मान्य केले.