गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बोकड चोरल्याच्या संशयातून मित्रानेच घेतला मित्राचा जीव

बोकड चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) येथे घडली आहे. सुरेश देवराव आत्राम (वय 42 रा.वनग्राम (चौकी) ता हिंगणा, जिल्हा नागपूर ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर अविनाश वसंतराव वासकर ( वय 35 रा, खापरी ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

संशयित आरोपी अविनाश याने सुरेश याला आपल्या गाडीवर बसवत शेतात नेऊन बोकड चोरल्याच्या करणातून त्याच्याशी भांडण काढले. यातून दोघांमध्यी वाद वाढला. त्यातूनच अविनाश याने सुरेश याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. यात सुरेश गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे डॉक्टरंनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी रात्रभर आरोपीचा शोध घेतला. अखेर गुरुवारी सकाळी गावातूनच ताब्यात अविनाश याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश हा बुधवारी वर्ध्याहून परत आल्यानंतर दुपारी तीन वाजता तो खापरी येथे पानटरीवर बसला होता. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने त्याला तेथून गाडीवर बसून आपल्या शेतात नेले. तेथे त्याला काठीने जबर मारहाण करण्यात आली. तेथून सुरेशने पळ काढला. परंतु, जबर मारहाण झाल्याने तो तेथेच जमिनीवर कोसळला. पुन्हा त्या ठिकाणीही अविनाश याच्याकडून मारहाण करण्यात आली. सुरेश रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर रिंग जात होती, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता.

आरोपीनेच फोन उचलून दिली माहिती

फोन वाजत असल्याने आरोपी अविनाश वासकर यानेच सुरेशचा फोन उचलला आणि सुरेश हा रोडवर पडून असल्याचे कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे गावातील काही तरुण रात्री साडेनऊच्या दरम्यान घटनास्थळी गेले असता सुरेश हा खापरी येथील गायमुख रोडवर नाल्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळले. त्याच्या हातापायावर तसेच पाठीवर मारहाणीच्या जखमा होत्या. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन बोकड गेले होते चोरीला

सुरेश आणि अविनाश हे दोघेही चांगले मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी ये-जा होते. अविनाश याचे काही दिवसांपूर्वी दोन बोकड चोरीला गेले होते. या संशयातूनच आरोपीने सुरेशला खापरी येथील आपल्या शेतात नेत त्याला मारहाण करून नाल्याजवळ गायमुख रस्त्यावर आणून टाकले. हत्या केल्याची तक्रार सुरेशच्या आईने पोलिसांत दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. याप्रकरणी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *