दोन महिन्यांपूर्वी एका रिक्षातून बदलापूरला न्यायला नकार दिल्याचा राग मनात धरून एका रिक्षाचालकाच्या डोक्यात चॉपरने वार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.
अंबरनाथच्या गायकवाड पाडा भागात कल्पेश पाटील हा तरुण राहतो. याच परिसरात राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोन गावगुंड राहतात.
सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्पेश हा त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवण करून परिसरात फिरत असताना राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. यापैकी चिकू बाविस्कर याने कल्पेशच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तर राहुल गायकवाड याने त्याच्याजवळील चॉपरने कल्पेश याच्या डोक्यात दोन वार केले.
यापैकी एक वार कल्पेशच्या डोक्यात बसला, तर दुसरा वार त्याने हातावर झेलला. यानंतर राहुल आणि चिकू या दोन गावगुंडांनी कल्पेशच्या घरी जाऊन त्याच्या दुचाकी आणि रिक्षाचीही तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, ही मारहाण झाल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. कल्पेश याने २ महिन्यांपूर्वी राहुल याला रिक्षातून बदलापूरला न्यायला नकार दिला असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय किरकोळ कारणावरून चॉपरने हल्ला केल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.