जमिनीच्या वादातून टोळक्याने महिलेची हत्या करून घर पेटून दिल्याचा बनाव करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी खाक्या दाखवला आहे. अनैतिक संबंधातून लग्नाचा तगादा लावल्याने दाजीनेच मेहुणीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीमधील हा प्रकार आहे.
आज (11 जून) पहाटे तीन वाजेच्या सुमारास महिलेची जमावाकडून हत्या केली. तसेच कातकरी कुटुंबांची तीन घरे जाळून टाकल्याची तक्रार शरद महादू वाघ याने घोटी पोलीस ठाण्यात दिली होती. या धक्कादायक घटनेमुळे इगतपुरी तालुका हादरला होता. मात्र, या घटनेचा पोलिसांनी खोलवर तपास केल्यानंतर तक्रारदारच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून लग्नाचा तगादा लावल्याने दाजीने मेहुणीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
संशयित आरोपी शरद वाघ हा इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीमध्ये राहातो. शरद वाघ याचे दोन लग्न झाले आहे. पत्नी असतांना त्याने एका मेहुणीशी लग्न केले आहे. त्यात गेल्या वर्षभरापासून त्याचे दुसऱ्या घटस्फोटीत असलेल्या दुसऱ्या मेहुणीशी अनैतिक संबंध होते. तिने शरदकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. मात्र, तिसऱ्या लग्नाला शरद याचा नकार होता. अशात दुसऱ्या मेहुणीने घर जाळण्याची धमकी देत घर पेटून दिले. या घटनेचा राग येत शरदने शस्त्राने दुसऱ्या मेहुणीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.