मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लाच्या हत्ये प्रकरणाचा छडा लावला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने घरी बोलावून सोनमचा गळा दाबून खून केला होता आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम शुक्ला ही तरुणी 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता ट्युशनला जाण्यासाठी आपल्या घरातून निघाली होती. त्यानंतर ही तरुणी बेपत्ता झाली होती. त्यानंतर या सोनमचा मृतदेह वर्सोवा भागात आढळून आला होती. सोनम शुक्ला ही गोरेगाव पश्चिम भागातील प्रेमनगर भागात राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम ट्युशनला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर निघाली होती पण ती ट्युशनला गेली नव्हती. रात्री 9 वाजेच्या सुमारास निघण्याआधी ती आपल्या एका मैत्रिणीच्या मित्राच्या घरी गेली होती.
सोनम रात्री 9.30 वाजले तरी घरी न आल्यामुळे तिच्या घरचे काळजी करत होते. वडिलांनी जेव्हा तिला फोन केला होता. त्यावेळी तिने आपण लवकरच घरी येणार आहे, मी सध्या माझ्या मित्राच्या घरी आहे, असं सोनमने वडिलांना सांगितलं. पण रात्री 11.30 वाजले तरी सोनम घरी आली नाही. वडिलांनी तिला पुन्हा फोन केला पण तो बंद होता.
सोनम शुक्ला ही बेकरी मालक असलेल्या मोहम्मद अन्सारी यांच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीचे आई-वडील घरी नव्हते. सोनम आणि आरोपी अन्सारी हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. यावेळी त्याच्या घरी वाद झाला होता. आरोपी अन्सारीने सोनमला घरी बोलावून तारेच्या वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर हात पाय बांधून तिचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि हे पोते मालाड पश्चिमच्या नाल्यात टाकून दिले होते. सोनमचा मृतदेह हा नाल्यातील मासे खाऊन टाकतील असा अंदाज आरोपीने बांधला होता.
तर दुसरीकडे, मुलगी घरी न आल्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी सोनमचा छिन्नविछन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह हा वर्सोवाच्या नाल्याच्या बाजूला आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह सोनमचा असल्याचं समोर आलं.
वडिलांनी आरोपी मोहम्मद अन्सारीचा उल्लेख केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि उलटतपासणी केली. तेव्हा आरोपी अन्सारीने सोनमच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, भाजपचे नेते कपील मिश्रा यांनी हा लव जिहादचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. देशभरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहे. या प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.