मराठा समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं अद्याप भिजतंय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं मागासवर्गातून मिळणारं आरक्षण रद्द केल्यानंतर नाराजीचे सूर आहेत. यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी यंदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.ते आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत.
याआधीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं होतं. छत्रपतींनी उपोषणाची घोषणा करताच राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, मराठी आरक्षणविषयी राज्यसरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत बोलताना ही घोषणा केली होती. 2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं.मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.