ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत.
यासोबतच पुढील चोवीस तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासून याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण गुजरात आणि लगतच्या मध्य प्रदेशात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांत पावसाला सुरुवात देखील झाली आहे.
उद्या महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. 23 जानेवारीनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, येत्या चोवीस तासांसाठी उत्तर आणि लगतच्या मध्य आणि पश्चिम अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा फटका गुजरात किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तास याचा परिणाम अधिक जाणवणार आहे.
त्यामुळे मच्छिमारांनी पुढील किमान पाच दिवस मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इथंपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.