संपूर्ण जगावर असलेलं कोरोनाचं संकट केव्हा दूर होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी सतावत असतो. या प्रश्नाचं उत्तर सापडायला सुरुवात झाली आहे. वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाच्या समीरण पांडा यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
पांडा यांनी म्हटलंय की 11 मार्चपर्यंत कोरोनाचा खात्मा व्हायला सुरुवात होईल आणि या महामारीच्या अंतालाही सुरुवात झालेली पाहायला मिळेल. आपण कोरोनापासून स्वत:चा बचावासाठी योग्य ती खबरदारी घेतली , कोरोनाचा नवा व्हेरीअंट आला नाही आमि ओमायक्रॉनने डेल्टा व्हेरीअंटची जागा घेतली तर महामारीच्या अंताला सुरुवात होईल असं पांडा यांनी म्हटलंय.
ओमायक्रॉनची लाट ही तज्ज्ञांनी मांडलेल्या गणितानुसार डिसेंबरपासून पुढचे 3 महिने राहील. पुढच्या 2 आठवड्यात मुंबई आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या परमोच्च बिंदूवर पोहोचून ती घसरायला लागते का हे पाहणं गरजेचं असल्याचं पांडा यांनी म्हटलंय.
तिसरी लाट ओसरतेय, पण चार दिवस महत्त्वाचे!
मुंबईत जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात दिवसाला 20 हजारांचा टप्पा ओलांडलेली रुग्ण संख्या सहा हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अजून तीन ते चार दिवस तिसऱया लाटेचा प्रभाव किती राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतरही रुग्ण संख्या आणखी कमी झाल्यास राज्य सरकारला शाळा सुरू करण्यासंदर्भात अहवाल देण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सद्यस्थितीत सहा हजारांपर्यंत रुग्णनोंद होत आहे. मात्र अजूनही काळजी घेण्याची गरज असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर दर दोन दिवसांनी राज्य सरकार आणि टास्क फोर्ससोबत पालिकेची बैठक होत असून आढावा घेतला जात आहे.