Uncategorized

परिचारक विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार ?

पंढरपूर नगर पालिकेच्या परिचारक सर्मथक आघाडीच्या विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना भोसले आणि सर्वच नगरसेवकांचा कार्यकाळ दिनांक ३० डिसेंबर रोजी संपुष्ठात येत आहे.वास्तविक पाहता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पंचवार्षिक कार्यकारी सदस्यांचा कार्यकाळ संपुष्ठात येण्यापूर्वी किमान १५ दिवस निवडणूक प्रकिया पूर्ण केली जाते.परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गास देण्यात आलेले आरक्षण मार्च २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रद्द झाले तर राज्य शासनाने काढलेला या बाबतचा अध्यादेशही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने या बाबत मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे.अशातच राज्य मंत्री मंडळाने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव संमत केल्याने या निवडणुका फेब्रुवारी अथवा मार्च २०२२ मध्ये होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.२०२२ मध्ये होणाऱ्या आगामी नगर पालिका निवडणुकीत परिचारक समर्थक आघाडी विरोधात स्व.आमदार भारतनाना भालके यांनी स्थापन केलेली तीर्थक्षेत्र विकास आघाडी मैदानात उतरणार कि महाविकास आघाडी याची उत्सुकता लागलेली असतानाच डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राज्यातील,देशातील इतर तीर्थक्षेत्राशी तुलना करता पंढरपूर शहर आणि परिसराचा पुरेसा विकास झाला नाही आणि त्यास वर्षानुवर्षे नेतृत्व करणारे येथील नेते जबाबदार आहेत अशी भूमिका एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.त्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला.वास्तविक पाहता अभिजित पाटील यांनी या शहर तालुक्याचे अनेक वर्षे नेतृत्व केलेल्या सर्वच नेत्यांच्या कार्यपद्धती बाबत प्रश्न उपस्थित केला पण काही परिचारक सर्मथक कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावर अभिजित पाटील यांच्यावर या निमित्ताने तुटून पडले.अभिजित पाटील यांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात घेतलेली भरारी,नफ्यात आणलेली बंद पडलेली साखर कारखानदारी आणि विविध उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना देत असलेले प्रोत्साहन यामुळे ते लोकप्रिय ठरले आहेत.आणि त्यांनी या शहर तालुक्याचे राजकीय नेतुत्व करावे अशी धारणा असलेला मोठा वर्गही या शहर तालुक्यात निर्माण झाला आहे.त्यामुळेच आगामी नगर पालिका निवडणुकीत अभिजित पाटील परिचारक विरोधी आघाडीचे नेतृत्व करणार का याची चर्चा होऊ लागली आहे.               

        स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर २०११ मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीची नोंदणी केली.२०११ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक,कल्याण काळे याना सोबत घेत नगर पालिका निवडणूक लढविली आणि यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे १८ नगरसेवक विजयी झाले आणि २३ वर्षानंतर नगर पालिकेत परिचारक विरोधी गटाची सत्ता आली.पुढे भीमा कारखान्याची सत्ता महत्वाची असल्याने धनंजय महाडिक यांनी पंढरपूर शहराकडे पाठ फिरविली.कल्याण काळे हे कारखान्यात रमले,तर आमच्यामुळे नगर पालिकेत सत्ता आली अशी भावना असलेले काही नगरसेवक आणि गल्लीनेते यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीत धुसफूस सुरु झाली.तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ३ नगरसेवक फुटले(कि फोडले गेले? ) आणि  नगर पालिकेत पुन्हा परिचारक सर्मथक सत्तेत आले.     

   ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार होता.तर नगरसेवक हे प्रभागवाईज.या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून संतोष नेहतराव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते पण अगदी उमेदवारी अर्ज दाखल होई पर्यत स्व.आमदार भालकेंच्या केबिनमध्ये नेहमी दिसून येणारे युवराज पाटील यांनी ऐनवेळी बंडखोरी केली तर पत्नीस परिचारक समर्थक आघाडीकडून उमेदवारी दिली असतानाही शिवाजी कोळी यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.त्यांच्या उमेदवारीमुळे आश्चर्य हि व्यक्त केले गेले आणि महादेव कोळी समाजातील मताचे विभाजन व्हावे यासाठीच त्यानी अर्ज दाखल केला अशी टीकाही झाली पण शिवाजी कोळी यांनी ताकतीने निवडणूक लढविली.       

 आता २०२२ मध्ये होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत परिचारक सर्मथक आघाडी विरोधातील आघाडीचे समर्थपणे नेतृत्व करेल असा नेता राहिला नाही अशी चर्चा होत असतानाच मागील काही महिन्यात परिवर्तन आघाडीची चर्चाही झाली.पण परिवर्तन आघाडीचे नेते म्हणून ज्यांचे नाव घेतले जात होते अशा एका नेत्याची भूमिका ऐनवेळी बदलू शकते अशीही चर्चा सुरु झाली तर विधानसभा पोटनिवडणुकीत थोडक्या मताने पराभूत झालेले भगीरथ भालके हे तूर्तास तरी शहर तालुक्यातील राजकीय घडामोडीपासून दूर असल्याने नगर पालिका निवडणुकीत ते परिचारक विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येणार का हेही एक प्रश्नचिन्हच आहे.भगीरथ भालके यांच्या सुविध्य पत्नी प्रणिता भालके या विविध राजकीय कार्यक्रमात आढळून येतात तर सात्वनपर भेटी,छोटे मोठे कार्यक्रम अशातही त्या हजेरी लावतात पण नगर पालिकेशी संबंधित प्रश्नाबाबत त्या फारश्या आक्रमक पवित्र्यात आढळून येत नाहीत.डिसेंबर २०२० मध्ये नगर पालिकेच्या अतिक्रमण मोहिमे विरोधात आणी जून २०२१ मध्ये संत तुकाराम सभागृहात नगर पालिके विरोधात भगीरथ भालके हे आक्रमक झाल्याचे दिसून आले.पण पुन्हा अनेक महत्वपूर्ण प्रश्नी मौन बाळगत ते शांत आहेत.   

  मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे आगामी नगर पालिका निवडणुकीत परिचारक गटाविरोधात हे सर्वपक्षीय मोट बांधून आघाडी करणार अशीही चर्चा काही काळ झाली पण आता हि चर्चा देखील थांबली आहे.अशातच अभिजित पाटील यांनी नुकतीच सोलापुरातील वृत्तवाहिनीशी बोलताना पंढरपूर शहराच्या रखडलेल्या,अपेक्षित असलेल्या व इतर तीर्थक्षेत्राशी तुलनात्मक असलेल्या विकास कामांबाबत बोलताना आक्रमपणे विविध मुद्दे मांडल्याने आगामी नगर पालिका निवडणुकीत ते परिचारक विरोधी आघाडी तयार करून त्या आघाडीचे नेतृत्व करणार का असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *