ताज्याघडामोडी

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथकाची स्थापना!

गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.या भरारी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या काळात 51 प्रकरणात 1 कोटी 21 लाख 79 हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य लक्ष्मण पवार, भास्कर जाधव, आशीष जयस्वाल, सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

थोरात म्हणाले की, गोदावरी नदी पात्रातील जागेचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसिलदार यांच्यासमवेत पंचनामा केल्यानंतर वाळुमाफियांनी नियमांचे उल्लंघन करुन आधुनिक साधनांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन नदी पात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे केले असल्याचे खरे नाही.

नदीला पूर आल्याने 17 वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण 5 टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाबरोबर समन्वयाने काम करण्यात येईल.

तसेच राज्यभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये 970 आरोपी अटक करण्यात आले असून 46 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. लवकरच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष यांच्याशी सुद्धा या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *