ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी करून राज्यांना सतर्क केले आहे. देशात Omicron च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी पुढील ६ ते ८ आठवडे भारतीयांसाठी गंभीर असतील, असा इशारा दिला आहे.
चिंता करणे आवश्यक आहे. ही चिंता काही आठवड्यांपूर्वीच आम्हाला झाली होती. त्यावेळी तो देशात ओमिक्रॉनचा प्रवेश झाला आहे की नाही? असं सुरू होतं. पण आता देशात ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत आहे. तो भारतात आधीच आहे आणि ओमिक्रॉनची संसर्गजन्य क्षमता ही डेल्टा व्हायरसपेक्षा तीन-चार पट जास्त आहे, असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. त्रेहान यांनी म्हणाले.
ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे आणि ब्रिटन, दुबई, अमेरिकेच्या आकड्यांवरून एक लाट पसरत आहे. एका कॉलेजच्या डॉर्मेटरीमध्ये ९०० विद्यार्थी होते आणि सर्वांना संसर्ग झाला. दुबईत एका पार्टीत ४५ लोक होते आणि ४० जण पॉझिटिव्ह निघाले. यापूर्वी कधीच इतक्या वेगाने संसर्ग पसरलेला नाही. भारतात त्याचे अचूक आकडे माहित नाहीत. कारण जिनोम सिक्वेन्सिंगला वेळ लागतो आणि प्रत्येकाचे जिनोम सिक्वेन्सिंग करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
आता फक्त रुग्णांची वाढती संख्या रोखायची आहे. यासाठी तीन गोष्टी कराव्या लागतील – पहिली म्हणजे चाचण्या वाढवाव्या लागतील. दुसरे, एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला ओमिक्रॉन झाला नसला तरी, त्याचा ओमिक्रॉन केस म्हणून विचार केला पाहिजे. त्यांचे त्याच प्रकारे आयसोलेशन केले पाहिजे. त्यांच्या संपर्कातील सर्वांचा त्वरित शोध घेतला पाहिजे.
ज्यांना तो झाला आहे, त्यांनी तातडीने उपचार करावेत. अशा परिस्थितीत एक भीती आहे. अधिक संसर्ग झाल्यास तो किती वेगाने पसरेल आणि किती लोक आजारी पडतील ज्यांना आयसीयूची गरज असेल. या काळात रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. पण ही स्थिती काही प्रमाणात आटोक्यात आणता येईल, असं ते म्हणाले.
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांबाबतही डॉ. त्रेहान यांनी इशारा दिला. ही एक संधी आहे. पुढे जाऊन मोठ्या गर्दीचे कार्यक्रम होणार आहेत. लग्नं सोहळे झालेत आणि अनेकांना संसर्ग झाला आहे.
म्हणूनच ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या हंगामात कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, नाईट कर्फ्यू, नाईट क्लब, बार बंद करणे आवश्यक आहे. वेळ खूप चुकीची आहे. पण पुढील ६ ते ८ आठवडे भारतासाठी खूप गंभीर आहेत, असा सतर्कतेचा इशारा डॉ. त्रेहान यांनी दिला.