विवाहेच्छुक तरुणांना हेरून लग्न लावून लाखोंची फसवणूक करणाऱया इचलकरंजी येथील टोळीस राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे.
याबाबत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथील विक्रम केशव जोगम (वय 24) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विक्रम जोगम यांचा विवाह 22 जून 2021 रोजी म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय 38, रा. चांदणी चौक, तारदाळ, ता. हातकणंगले) हिच्याशी झाला होता. यावेळी विवाह ठरविण्यासाठी संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबू शेख, समिना फिरोज शेख (रा. शाहूनगर चंदुर, सध्या रा. ठाकरे चौक, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपये घेतले होते.
हा विवाह ठरविताना यापूर्वी झालेल्या तीन विवाहांची माहिती लपवून ठेवली होती; तर विक्रम जोगम यांच्याकडून घेतलेली रक्कम त्यांनी वाटून घेतली होती. त्यानुसार संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चार आरोपींना इचलकरंजी येथून राधानगरीचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सुरेश मेटील यांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.