नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याला बँकेनं कर्ज वसुलीबाबत नोटीस पाठवली आहे. संबंधित नोटीस बजावल्यानंतर, आर्थिक संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांने बँकेसमोरच विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बँकेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
केशव रामदास पवार असं आत्महत्या करणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते माहूर तालुक्यातील नयेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बुलडाणा अर्बन बँकेचं दोन लाखांचं कर्ज होतं. दोनेक दिवसांपूर्वी बँकेनं त्यांना कर्जफेडीबाबतची नोटीस पाठवली होती. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास पवार हे कर्जाबाबत चौकशी करण्यासाठी बँकेत गेले होते. पण बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बँकेच्या आवारातच विष प्राशन केले आहे.
मृत पवार यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं, हाता-तोडांला आलेला घास अस्मानी संकाटानं हिरावला होता. त्यामुळे पवार मागील काही काळापासून आर्थिक संकटांचा सामना करत होते. तसेच बँकेचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून त्यांना नैराश्य आलं होतं. अशात बँकेनं कर्जवसुलीसाठी नोटीस बजावल्यानं पवार यांनी आपलं जीवन संपवलं आहे. पवार यांनी अशा पद्धतीनं हृदयद्रावक शेवट केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.