अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये शनिवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला.
पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, गेल्या 24 तासात मुंबईत 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारनंतर राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने सांगितले की, शनिवार ते 10 नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहेमध्ये सोमवारी पाऊस पडू शकतो, तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानाममध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडू शकतो.