स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेट्टींनी टीकास्त्र डागलं. साखरेला चांगले भाव आले असतानाही एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय.
गेली 19 वर्षे याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या आणि दर मागून घेतला. पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती. आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आपण आणलं. पावसात भिजत-भिजत हे सरकार आलं. यांना महापुराची जाण असेल असं वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. सरकारनं काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलंच असेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचं संकट आलं. पैसे नाही म्हणालात आणि 11 टक्के महागाई भत्ता दिला, असा घणाघात शेट्टी यांनी केलाय.