लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्यांचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांमधील व्यापाऱ्यांचा या बंदला विरोध आहे. व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई व्यापारी संघटनेने म्हटले की, “ते शेतकऱ्यांची दुर्दशा आणि वेदना समजून घेतात, त्यांना पाठिंबाही देतात, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतात. पण व्यापाऱ्यांना या बंदमध्ये ओढू नये.”मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील व्यापारी संघटनांनीही दुकाने उघडी राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनीही बंदला विरोध केला आहे, ‘राजकीय पक्षांचे राजकारण सुरू राहू द्या, पण चित्रपटांचे शूटिंग थांबणार नाही.’ ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देतो. शूटिंग बंद ठेवणे आता फिल्म इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना असह्य झाले आहे.”
भाजी पुरवठ्यावर परिणाम?
नवी मुंबईची एपीएमसी मार्केट सोमवारी बंद राहणार असल्याची माहिती आहे. भाजीपाला येथून मुंबई आणि जवळपासच्या भागात पुरवला जातो. त्यामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. परंतु रुग्णालये, औषध दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत.
राज्यातील सत्ताधारी पक्षांनीच बंद पुकारला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, बंद सरकारचा समजू नये, त्याला पक्षांच्या पातळीवर पाठिंबा दिला जात आहे. परंतु या पक्षांनी जनतेला बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.