उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेल काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस पक्षांना डिवचलं आहे. त्यामुळे आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“हे काँग्रेसचे लोकं. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोकं जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो,” असे आशीष जयस्वाल यांनी म्हटले आहे.