मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.
सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या
सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता.’आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला.
सदाशिव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता.. त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स केला होता.. मात्र मराठा आरक्षण नसल्यानं पाहिजे तशी नोकरी मिळत नव्हती, असा त्याचा आरोप होता. शिवाय शेतात ओला दुष्काळही आहे आणि याच विंवचनेत सदाशिवनं घरातील छताच्या पंख्याला मंगळवारी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
आत्महत्या करण्यापूर्वी सदाशिवनं एक सुसाईड नोटही लिहून ठेवली. यामध्ये त्याने ओला दुष्काळ आणि मराठा आरक्षण नसल्याने आत्महत्या करीत आहे, असं स्पष्ट उल्लेख केला आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले आहेत. महिना-दोन महिन्यांनी अशी बातमी राज्यातून येतीय. त्यापेक्षा एकदाच आरक्षणाचा निकाल लावून टाका, अशी मागणी येणोरा गावातील मराठा तरुणांनी केलीय.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या पायाला भिंगरी, आत्महत्या न करण्याचं मराठा तरुणांना आवाहन
संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलिकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.
तर दुसरीकडे मराठा आरक्षण आपल्याला मिळणार आहे. तुम्ही खचून जाऊ नका, निराश होऊ नका, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा तरुणांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे.