पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे लिलाव रखडल्यामुळे अवैध वाळू उपसा हे महिन्याकाठी लाखो रुपये मिळवून देणारे साधन झाल्याचे दिसून येते.वास्तविक पाहता या गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी हि संबंधित नदीकाठच्या गावातील तलाठी,मंडल अधिकारीयांची आहे.तलाठी,कोतवाल हे पद निवासी असल्याने डोळ्यात तेल घालून सरकारी मालमत्तेचे अर्थात वाळूसह गौण खनिजाचे रक्षण करणे,वेळप्रसंगी कारवाई करणे,कारवाई करत असताना आवश्यकता वाटल्यास पोलीस ठाण्यास वर्दी देऊन त्यांची मदत घेणे हा यांच्या कर्तव्याचा भाग समजला जातो.गावच्या नदीकाठच्या विविध गटाच्या हद्दीत नदीमध्ये व परिसरात किती वाळू साठा आहे याचे मोजमाप ठेवणे, त्याची माहिती जिल्हा महसूल अधिकारयांना कळविणे अपेक्षित असते.वाळू साठ्याची चोरी होऊ नये यासाठी शासनाने टोटल स्टेशन सिस्टीम प्रणालीद्वारे वाळू साठ्यांचे मोजमाप केले जावे आणि या वाळूसाठ्यांचे रक्षण केले जावे असे आदेश वेळावेळी काढले आहेत.मात्र गेल्या दीड वर्षाच्या कालावधीचा विचार करता तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर बहुतांश कारवाया या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः माहिती प्राप्त करूनच केल्याचे आढळून येते.