राज्यात येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असं ट्विट हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी केले आहे.
बुधवारी पालघरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मंगळवारी आणि बुधवारी मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे येथे बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
सोमवारी अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ तर मंगळवारी अकोला, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर येथे मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज आहे. उस्मानाबादमध्येही रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर परभणीमध्ये सोमवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर तीव्र मुसळधार स्वरूपाचा असू शकेल. औरंगाबाद, जालना येथेही सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.