सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत शाखेमध्ये फेरफटका मारल्यास ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत गावात येत नाही,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना अंधारात ठेवून कामकाज करतो,ग्रामस्थाच्या तक्रारीची दखल घेत नाही,आर्थिक गैरप्रकार करतो,तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकऱ्याकडे तक्रार करूनही गटविकास अधिकारी दखल घेत नाही.१५ वित्त आयोगातून ग्रामस्थाना अथवा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन कामे काढली जात नाहीत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येथे करण्यात येत असल्याचे दिसून येथे तर प्राथमिक शाळा आणि यात कार्यरत असलेले शिक्षक यांच्या कार्यपद्धतीबाबत असेच अनेक आक्षेप,तक्रारी करण्यात येतात.तालुका पातळीवर गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करूनही काही कामचुकार शिक्षक संघटनेच्या,राजकीय पाठबळाच्या आणि वशिलेबाजीच्या बळावर त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींना दाद देत नाहीत,हा सारा मामला लक्षात घेत जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हाभर तपासणी करून माहिती घेऊन गैरप्रकार दिसताच कारवाई करता यावी यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण जिल्हा परिषद प्रशासन,या अंतर्गत येणारे विविध विभाग आणि तालुका पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये मोठा दरारा निर्माण केला असून कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी यांना सन्मानाची वागणूक तर कामचुकार,निष्क्रिय अथवा निराशाजनक कामगिरी असलेले अधिकारी व कर्मचारी यांची गय न करता निर्माण केलेला वचक हा सोलापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरला आहे.जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हाभर फिरून स्वतंत्र तपासणी व कारवाई करणारे विशेष पथक(lcb scod ) असते त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या अधिपत्याखालील पथक जिल्हाभर अचानकपणे कोठेही जाऊन तपासणी करून आपला अहवाल थेट वरिष्ठाना सादर करणार असल्याने कामचुकार ग्रामसेवक आणि शिक्षकांचे टेन्शन मात्र वाढले आहे.