ताज्याघडामोडी

शेतकर्‍यांच्या जनसंघर्षाला पहिले यश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली  बैठक; 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत

शेतकर्‍यांच्या जनसंघर्षाला पहिले यश
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली  बैठक; 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत
। पंढरपूर, प्रतिनिधी
गेल्या 30 वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात उजनी उजवा कालवा वितरिकेवरील भूसंपादन प्रश्‍न रेंगाळला असून या प्रश्‍नाचा कायमचा निपटारा करण्यासाठी व नव्याने पीक पाणी नोंदी धरून, नव्या रेडीरेकनर कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍यांच्या सुशिक्षित मुलांनी जन संघर्षाचा लढा उभा केला आहे. या लढ्यास सोमवारी पहिले यश आल्याचे पहावयास मिळाले.
सोमवारी सकाळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यालयांमध्ये उजनी विभागाच्या अधिकार्‍यांसोबत उजनी बचाव संघर्ष समितीच्या शेतकरी व पदाधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून पुढील आठ दिवसात उजनीच्या अधिकार्‍यांनी सर्व अहवाल तयार करून देण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या असल्यामुळे तालुक्यातील तब्बल 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीच्या रूपाने जनसंघर्षाचे  हे पहिले यशस्वी पाऊल असल्याचे मानले जात आहे. सदर बैठक ही मागील 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी भूसंपादन मोबदल्याच्या विषयी होती, मागील महिन्याभरापासून संघर्ष समितीचे पदाधिकारी उजनी पाठबंधारे विभाग व शासन प्रशासनाने भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मान्य नाही म्हणून आक्रमक झाले होते, त्यासंदर्भात त्यांनी आपली बाजू लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडली होती, त्यामुळे प्रांताधिकारी सचिनजी ढोले  यांनी भूसंपादन बाबतीत शेतकर्‍यांचा प्रश्‍न समजून घेऊन बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रथम शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली, तत्कालीन तलाठ्यांनी शेतकर्‍यांना विचारात न घेता मनाला वाटेल तश्या पीकपाणी नोंदी लावल्याने शेतकर्‍यांना खूप मोठी किंमत मोजावी लागत आहे, व पाठबंधारे अधिकार्‍यांनी ही प्रत्यक्ष जागेवर येऊन सर्व्हे न करता चुकीचा अहवाल तयार केला व त्यामुळे शेतकर्‍यांना याचा फार मोठा फटका बसला आहे, तसेच भूसंपादन करताना केलेल्या चुका, मूल्यांकनच्या बाबतीत झालेल्या चुका याबद्दल सविस्तर चर्चा झाली, प्रांत  सचिन ढोले यांनी भूसंपादन अधिकार्‍यांच्या चुका लक्षात आणून देऊन त्या काळजीपूर्वक दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या,तसेच प्रत्यक्ष भूसंपादन ठिकाणी जाऊन सत्यपरिस्थीती पडताळणीसाठी ही सूचना दिल्या.  उपस्थित सर्व शेतकर्‍यांनी आपल्या सर्व समस्या  अगदी स्पष्ट पणे मांडल्या तेव्हा त्यांचे यथोचित समाधान केले गेले.त्यामुळे शेतकर्‍यांच्या गोटात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे.
ज्या ज्या शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे, ज्यांच्या काही समस्या आहेत अशा सर्व शेतकर्‍यांच्या  समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे, तसेच ज्यांची पीकपाणी नोंद चुकली असेल अशा सर्वांच्या नोंदी दुरुस्ती साठी योग्य पावले उचलली पाहिजेत, भूसंपादन साठी गेलेले क्षेत्र व सोडून शिल्लक क्षेत्राच्या 70 टक्के ज्याचं बागायत आहे अशा सर्व शेतकर्‍यांना बागायती जमिनीचा मोबदला मिळणे गरजेचे आहे अशीही भूमिका प्रांताधिकारी ढोले यांनी घेतली व पीकपाणी नोंदी निवाड्याच्या वेळी शेतकर्‍यांना विचारात घेणे गरजेचे होते,शेतकर्‍यांना विचारात न घेता त्यांच्या जमिनीचा निवाडा करणे हे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीतल्या सकारात्मक चर्चेमुळे तालुक्यातील 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या बैकीला उजनी चे कालवा विभाग क्र.9 चे उप.कार्य.अभियंता च.ॠ.पंडित,श्यामराव मोटे हे अधिकारी उपस्थित राहिलेबद्दल संघर्ष समितीचे सदस्य समाधान गाजरे यांनी त्यांचे आभार मानले.

शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व गरज पडल्यास लढा आणखी तीव्र करण्यासाठी  समितीने येत्या दि. 5 ऑगस्ट रोजी उपरी ता.पंढरपूर येथे सहविचार सभेचे आयोजन केले आहे.कारण लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विविध अधिकारी यांच्या बरोबर ही बैठकीचे नियोजन असल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *