सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणी साठा वजा पातळीत असल्याच्या बातम्या दोनच दिवसापूर्वी माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर आज पंढरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या सहीचे उजनी धरणातून ८० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याचे एक पत्र विविध गावातील सोशल मीडियावर फिरू लागले आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली.
उजनी धरण मायनस मध्ये आहे,आषाढी यात्रा भरली नाही,सोलापूर शहराने अजून पाणी सोडण्याची मागणी केली नाही मग ८० हजार क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी का सोडले जात असेल अशी शंकाही व्यक्त होऊ लागली.गटविकास अधिकारी पंढरपुर यांच्या सहीचे (?) पत्र असल्याने व नदीकाठच्या गावात दवंडी देणे,सोशल मीडियावर माहिती देणे आदी सूचना यात नमूद करण्यात आल्याने संभ्रम आणखी वाढला होता.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत उपकार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग यांनी गटविकास अधिकारी पंढरपूर यांना तातडीने ईमेलद्वारे पत्र पाठवून उजनी धरणातून सद्य स्थितीला पाणी सोडण्यात आले नसल्याचे सांगितले आहे.