कोरोनाच्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातले होते. पण आता राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही’ अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यावर समोरील मोठे संकट तुर्तास टळले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात असताना कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण, जुलै महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी ‘राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही’ असं सांगितलं आहे.जून महिन्यात राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर राज्य सरकारने 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेरीस राज्य सरकारच्या या लढ्याला यश आले आहे.
तसंच, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, विमान मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीनी लशीचे दोन डोस घेतले असतील तर परवानगी आहे. RTPCR टेस्ट ऐवजी ज्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले असतील ते प्रमाणपत्र दाखवले तर हवाई मार्गे महाराष्ट्रात यायला परवानगी आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.