ताज्याघडामोडी

शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

पुणे -राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून उघड केल्याने करोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने चर्चेला घाबरून दोन दिवसात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन गुंडाळत लोकशाहीला कुलूप बंद करण्याचे काम केले आहे.

तसेच हे अधिवेशन एकतर्फी चालवित भाजप आमदारा विरोधात शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचे आरोप करून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, त्यावेळी आपणही सभागृहात होतो.

तसेच एक जबाबदार पक्षाचा प्रमुख म्हणून पीठासीन अध्यक्ष यांना कोणी शिवीगाळ केली हे योग्यवेळी मी उघड करेल, असा इशारा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, राज्यासमोर अनेक प्रश्‍न आहेत. त्यावर अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण होण्यास महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. आम्ही वारंवार शासनाने काय करावे याबाबत सांगत होतो.

मात्र, आघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आघाडी सरकारला उघडे पाडण्याचे काम आम्ही केले. या सर्व बाबींबर अधिवेशनात चर्चा होणे आवश्‍यक होते. मात्र, करोनाचे कारण पुढे करत सरकारने दोन दिवसात हे अधिवेशन गुंडाळले.

राज्यसरकारने एकतर्फी अधिवेशन चालवून आमचे आमदारां विरोधात कपाक्‍ल्पित आरोप करुन त्यांचे वर्षभरासाठी निलंबन केले. ओबीसी आरक्षणाचे मुद्‌द्‌यावरुन सत्तारुढ पक्ष उघड पडल्याने त्यांनी आमच्यावर खोटे आरोप करुन कारवाई केली.

तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच धनगर आरक्षण न मिळण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे सांगत ही आरक्षणे मिळत नाहीत तो पर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच राहणार आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले, पण डबे बदलून उपयोग नाही. तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवे, अशी बोचरी टीका केली होती. पटोलेंच्या या टीकेला आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते.

नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य कॉंग्रेसबद्दल होत का? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा कॉंग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही असे प्रत्युत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *