कोरोनाचे संकट काहीसे कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिंदुस्थानातील नागरिकांना एक दिलासादायक सल्ला दिला आहे. कोरोना आजाराची लक्षणे नसलेल्या नागरिकांनी सकारात्मक विचार करावेत आणि सकस आहार घेऊन आपली रोगप्रतिकारकशक्ती (इम्युनिटी) वाढवावी. त्यांना कोरोनावरील कोणत्याही औषधांची गरज नाही, असे सांगत वैद्यकीयतज्ञांनी कोरोनाचा धसका घेतलेल्या नागरिकांना मोठा धीर दिला आहे. लक्षणे नसतील तर उत्तम आहार घ्या, काही काळ कोरोना प्रतिबंध पाळा. तुम्हाला या महामारीपासून काहीही होणार नाही, असे या तज्ञांनी ठामपणे सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.
यानुसार ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा त्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही, परंतु इतर आजारांसाठी सुरू असलेली औषधे सुरू ठेवावीत. अशा रुग्णांनी टेली कन्सल्टेशन (व्हिडीओद्वारे उपचार) घ्यावेत. चांगला आहार घ्यावा आणि मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारखे आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आरोग्य मंत्रालयाने सुचवले आहे.
उगाच रुग्णांची लूट नको !
कोरोनाची भीती घालून नागरिकांची तुफान लूट करणाऱया मेडिकल लॉबीला वेसण घालणारे निर्देश आता डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS) यांनी दिले आहेत. नवीन गाइडलाइननुसार असिम्प्टोमेटिक रुग्णांच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी सर्व औषधे या यादीतून काढून टाकली आहेत. यामध्ये ताप, सर्दी आणि खोकला या औषधांचादेखील समावेश आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, अशा संक्रमित लोकांना इतर टेस्ट करून घेण्याचीदेखील गरज नाही.
यापूर्वी 27 मे रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती, ज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, इव्हर्मेक्टिन, डॉक्सिसायक्लिन, झिंक आणि मल्टीव्हिटॅमिन वापरण्यास मनाई होती. याशिवाय एम्पोमॅटिक रुग्णांना सीटी स्पॅनसारख्या अनावश्यक टेस्ट लिहून देण्यासही मनाई होती. उगाच कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची आणि देशातील नागरिकांची लूट कराल तर याद राखा, असे कठोर निर्देशच पेंद्रीय आरोग्य महासंचालकांनी दिले आहेत.