नवी दिल्ली, 4 मे : देशभरात कोविड 19 च्या कहरामुळे परिस्थिती बिघडली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान अनेक राज्यांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक महिना शिव भोजन थाळी मोफत देणार असल्याची घोषणा केली होती.
अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल, असंही ते म्हणाले होते.
याशिवाय कंन्स्ट्रक्शन क्षेत्रातील 12 लाख मजुरांना 1500 रुपयांपर्यंत आर्थिक मदत, अधिकृत फेरीवाले आणि परमीट रिक्षा चालकांना 1500 रुपयांची मदत केली जाणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मंगळवारी मोठी घोषणा केली. दिल्लीत तब्बल 72 लाख रेशन कार्ड धारकांना दोन महिन्यांपर्यंत मोफत रेशन दिलं जाईल. याशिवाय केजरीवाल सरकारने हादेखील निर्णय घेतला आहे की, ते रिक्षा-टॅक्सी चालकांना 5-5 हजार रुपयांची आर्थिक मदत देतील.
कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दिल्लीत लॉकडाऊन लावणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र लॉकडाऊन गरीबांसाठी मोठं आर्थिक संकट ठरू शकतं, विशेषत: वेठबिगारी मजूर जे दररोज कमवतात आणि त्यात घर चालवतात, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अवघड आहे.
-दिल्लीत तब्बल 72 लाख रेशन कार्ड धारकांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत रेशन मिळेल. याचा अर्थ लॉकडाऊन दोन महिने चालेल असं नव्हेत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-सोबतच ऑटो आणि टॅक्सी चालकांना 5-5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
-गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दिल्ली सरकारने तब्बल 1 लाख 56 हजार वाहन चालकांची मदत केली होती.
-सर्वांना अत्यंत कठीण काळाचा सामना करावा लागत आहे.