मुंबई | देशासह राज्यात देखील ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात लसीकरण तर चालू केलं आहे पण अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काहींना पहिला डोस लवकर मिळत नाही तर काहींना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत आहे. यावर आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज आहे, पण फक्त 25 हजार लसी मिळतात, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
45 वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त 30 हजार व्हॅक्सिन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात 9 लाख डोस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ते द्यायचे आहेत. महाराष्ट्राला 8 लाख दैनंदिन वॅक्सिनची गरज आहे, पण फक्त 25 हजार लसी मिळत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा देशाचा रिकव्हरी रेट जास्त आहे. सध्या राज्यात 84.7 टक्के रिकव्हरी रेट आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 27 वरून 22 टक्क्यांवर आला आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचं आपण ठरवलं आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लीकेज थांबवणं, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे. ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात आपण 150 पेक्षा जास्त प्लांटची ऑर्डर दिली आहे. तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वयंपूर्ण झालंच पाहिजे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 18 ते 44 वयातील लोकांना आपण आतापर्यंत 1 लाख लोकांना लस दिलेली आहे. कोव्हिशील्डच्या 13 लाख 80 हजार डोसची ऑर्डर दिलेली आहे. तर कोव्हॅक्सिन लसीसाठी 4 लाख 79 डोसची ऑर्डर दिलेली आहे. असं साधारण मिळून 18 ते साडे अठरा लाख लसींची ऑर्डर दिलेली आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.