ताज्याघडामोडी

वधू-वरासह वऱ्हाडींना लग्नमंडपातून हाकलले; जिल्हाधिकारी निलंबित

अगरतला : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे बहुतेक सर्वच राज्यांमध्ये लग्न समारंभांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. उपस्थितांच्या संख्येसह मास्कचा वापर करण्याबाबत नियम करण्यात आले आहेत. त्याचे पालन केल्यास कारवाई केली जात आहे. अशाच एका लग्न समारंभावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकला. त्यांनी वधू-वरासह वऱ्हाडींना अपमानित करून मंडपाबाहेर काढले. काहींना लाठ्याही खाव्या लागल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचे आरोपही होत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपच्या पाच आमदारांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करत निलंबित केले असून राज्याच्या मुख्य सचिवांकडे या प्रकाराचा अहवाल मागितला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकारानंतर माफी मागितली आहे.

काय केले जिल्हाधिकाऱ्यांनी?

पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी दोन दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात छाप टाकला होता. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटाही होता. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शैलेश यादव हे अत्यंत रागात दिसत आहेत. कोरोनाचा प्रोटोकोल तोडला म्हणून ते लग्नात उपस्थित सर्वांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. त्यांनी नवरदेवाला धक्का मारून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच ज्येष्ठांनाही असभ्य भाषेत बोलत अपमानित करून बाहेर काढले.

लग्नासाठी परवानगी घेतलेले पत्र यादव यांना दिल्यानंतर त्यांनी ते फाडून वऱ्हाडींच्या अंगावर फेकून दिले. या कारवाईत अडथळा आणल्याचे कारण पुढे करून काहींवर ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी तिथेच पोलिसांना दिले. जवळपास 30 जणांना त्यांनी ताब्यात घेतले. तसेच गुन्हाही दाखल केला. काही जणांवर पोलिसांनी लाठीहल्लाही केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

टीका अन् कौतुकही

शैलेश यादव यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणीही अनेकांनी केली. भाजपचे त्रिपुरातील पाच आमदारांनी मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्याकडे ही मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित केले. तसेच मुख्य सचिवांना या कारवाईची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. यादव यांच्या या कारवाईचे अनेकांनी कौतूकही केले आहे. सध्याच्या स्थितीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर अशी कारवाई झाली पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे.

शैलेश यादव यांनी मागितली माफी

सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यादव यांनी माफी मागितली आहे. आपला उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *