मुंबई- राज्यात कठोर निर्बंध लावून सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. काही तासांत लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील, असंही ते म्हणाले आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही तासांत राज्याक कडकडीत लॉकडाऊन लागू होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
राज्यात सध्या ऑक्सिजन पुरवठयाची कमतरता आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनकडे होत आहे. कडक लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स लवकरच जारी करण्यात येतील, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली. संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची आज गरज आहे. निर्बंध लादूनही रुग्णसंख्या कमी होत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लोकांचीही अशीच इच्छा आहे. कारण, सर्वांना माहिती आहे की आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी रात्रीपासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली होती. सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विनंती केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या निर्णय घेतील, असं ते म्हणाले. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन होणार हे निश्चित झालं आहे. उद्या रात्री आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते उद्या काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असेल.