मुंबई, 28 मार्च : राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.