ताज्याघडामोडी

शैला गोडसेंचा आक्रमक संघर्ष विचारात घेत राजकीय पुनर्वसन केले जाणार ?

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विविध प्रशांसाठी गेल्या काही वर्षांपासून पायाला भिंगरी बांधून ग्रामपंचायत पातळीपासून ते थेट मंत्रालया पर्यंत पाठपुरावा करून विविध प्रश्‍नांना  वाचा फोडणार्‍या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलाताई गोडसे यांना शिवसेनेच्या हक्काच्या पंढरपूर विधासभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार हे निश्‍चित मानले जात होते. स्वतः शैला गोडसे यांनीही २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवायच्या दृष्टीकोनातुन जोरदार तयारीही  केली होती अशातच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याची एकही जागा शिवसेना सोडणार नाही अशी घोषणा केलेले जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्या याच वक्तव्यावर विश्‍वास ठेवीत शैला गोडसे या आपली उमेदवारी निश्‍चित मानत कामालाही लागल्या होत्या पण ऐनवेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या व पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात नगण्य अस्तित्व असलेल्या रयत क्रांतीला हि जागा सोडली गेली आणि खर्‍या अर्थाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेच्या अनेक कट्टर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला होता.तर शैला गोडसे यांच्या रूपाने या मतदार संघातून प्रथमच एक महिला निवडणुकीत उतरणार असल्याने उत्साहात असलेल्या महिला मतदारांचाही मोठा अपेक्षाभंग झाला होता. मात्र हा सारा धक्का सहन करीत शैला गोडसे या अतिशय संयमाने युतीधर्माचे पालन करीत रयतक्रांतीचे उमेदवार  परिचारक यांचा प्रचार केला होता.मात्र या प्रचारा दरम्यान शैला गोडसे यांना दूर ठेवले जातेय अशीच भावना त्यांच्या समर्थकांत होती आणि मंगळवेढा येथे झालेली मुख्यमंत्र्यांची सभा असो अथवा भाजपाच्या प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांचा महिला मेळावा असो शैला गोडसे यांना स्थान नव्हते हे दिसून आले आहे. 

पण या सार्‍या घडामोडीवर या दोन्ही तालुक्यातील कट्टर शिवसैनिक व शिवसेना समर्थक लक्ष ठेवून होते त्यामुळे त्यांच्यातून खाजगीत नाराजीही व्यक्त होत होती. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि गत निवडणुकीत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार शैला गोडसे याना करावा लागणार आहे हे विधानसभा पोटनिवडणुकीत भालके कुटुबातीलच उमेदवार असणार या बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात दिलेल्या संकेतामुळे निश्चित मानले जात आहे.    

             मात्र पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर राजकीय गोटात उमेदवारीबाबत घडत असलेल्या या घटना क्रमात शैला गोडसे या पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्या असल्याचे दिसून येत आहे.सोलापूर जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे सांगोला विधानसभा मतदार संघाचे शहाजीबापू पाटील हे एकमेव आमदार आहेत.शिवसेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीचा अभ्यास केला असता सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नासाठी आक्रमक आंदोलने करून देखील निवडणुकीच्या राजकारणात शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे दिसून येईल.२०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे जवळपास २३ कॅबिनेट व राज्यमंत्री सरकारमध्ये सहभागी होते.याचा फायदा घेत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट करण्याची संधी शिवसेनेला होती.महायुती सरकार मधील तत्कालीन कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत संपर्क प्रमुख म्हणून जोरदार व्युव्हरचना या काळात केली खरी परंतु सत्ताकारणी आयाराम आणि काही डबल ढोलकी पदाधिकारी यांच्यामुळे आमदार तानाजी सावंत याना पक्ष विस्ताराचे शिवधनुष्य पेलताना मोठी कसरत करावी लागली.शैला गोडसे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी केलेला संघर्ष आणि पाठपुरावा यामुळे प्रभावित झालेल्या आमदार तानाजी सावंत यांनी जून २०१९ मध्ये मंगळवेढा येथे झालेल्या पाणी परिषदेत शैला गोडसे याना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित असल्याचे जाहीर केल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शिवसैनिकांचा उत्साह वाढला होता.पण घडले उलटेच,पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात प्रभावहीन असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेस भाजपाने हि जागा सोडून दिली आणि शिवसेनेने कुठलाही विरोध न करता याला मूकसंमती दिली.         

महायुतीच्या माध्यमातून शिवसेना वाट्यास आलेली एकही जागा गमावणार नाही त्याठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असा ठाम विश्‍वास आ.तानाजी सावंत हे व्यक्त करीत होते पण जिल्ह्यात शिवसेनेस केवळ सांगोला विधानसभा मतदार संघातून येथील पारंपरिक उमेदवार आ.शहाजी पाटील हे विजयी झाल्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा थोडी का होईना वाचली होती.  आता जे महायुतीच्या काळात घडले त्याचीच पुनरावृत्ती महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या पोट निवडणुकीत होणार होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील शिवसैनिक व शिवसेना समर्थक पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आहेत.आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीचे नेते,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार भालके परिवारातीलच राहणार असल्याने या दोन्ही तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय असणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात गेल्या काही वर्षात आक्रमक आंदोलने,जनतेच्या विविध प्रश्नासाठी मातोश्री,मंत्रालय ते थेट ग्रामपंचायत पातळीपर्यंत पाठपुरावा,अनेक महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक यामुळे या दोन्ही तालुक्यात शिवसेनेचा प्रभाव वाढवताना घराघराच्या प्रत्येक दारावर टकटक करीत साधलेला संवाद,चिटकावलेले स्टिकर शिवसेनेतील एक महिला नेत्याही किती आक्रमकपणे काम करू शकते याची साक्ष दिली होती.आणि शैला गोडसे यांच्या याच प्रभावी कार्यपद्धितीची दखल घेत राजकारणात महिला नेतृत्वास बळ देण्याच्या हेतूने शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविचारातून पुढे आलेल्या ”प्रथम ती” या संकल्पनेस पंढरपुरात भव्य महिला मेळावा घेऊन शिवसेनेने केली होती.   

   आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार हा राष्ट्रवादीचा असणार हे स्पष्ट झाले आहे.सांगोल्याचे शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने सध्या जिह्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे.त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेस बळ देण्याच्या हेतूने व पश्चिम महाराष्ट्रात मतदार संख्येच्या निम्म्याने असलेल्या महिला मतदारांचे पाठबळ मिळविण्याच्या हेतूने तरी शिवसेनेचे वरिष्ठ नेते शैला गोडसे यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याच्या हेतूने विधान परिषद,महामंडळ,मंदिर समिती अध्यक्ष आदी पदाच्या माध्यमातून पुनर्वसन करीत बळ देणार का याकडे आता जिल्ह्यातील शिवसेना प्रेमींचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *