आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे,’ असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शर्जील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने देखील शर्जीलवर कारवाई करणार असल्याचे म्हटले.
पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शार्जील उस्मानी चर्चेत आला आहे. त्याच्या या वादग्रस्त कृतीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का ? सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं, अशा शब्दांत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.