ताज्याघडामोडी

‘उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील’, आमदार रवी राणा यांचा सर्वात मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजप पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं आहे. असं असताना आता आमदार रवी राणा यांच्या एका दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत येतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. मी नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांनी मोदींना साध घातल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता रवी राणा यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे असंच काहीसं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनीही केलं होतं.

“उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सोबत येतील”, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्याचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे मोदींचं नेतृत्व स्वीकारतील. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं रवी राणा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *