महिला मोबाईलवर पतीसोबत बोलत असताना दिराने मागून येत चाकून गळा कापल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये घडली आहे. रविवारी घडलेल्या या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही कुटुंबात एका जमिनीवरून वाद सुरू होता. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला सध्या अटक केलेली नाही. पण लवकरच पडकण्यात येईल.
चुनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. गावातील एका व्यक्तीने फोन करून पोलिसांना महिलेची हत्या झाल्याचं सांगितलं. पोलिस घटनास्थळी पोहोचताच त्यांना महिलेचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. महिलेचा गळा कापण्यात आला होता. महिलेचं नाव रोजी असल्याचं समजते. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले की, जावेद आणि त्याच्या भावात कौटुंबिक वाद आहे. दोघांमध्ये एका जमिनीवरून सतत खटके उडत होते. रोजी कोणत्याही परिस्थितीत जावेदला जमीन देण्यासाठी तयार नव्हती. यावरून घरामध्ये टोकाचे वाद होत होते. रविवारीही यावरूनच वाद झाला. जावेद आणि रोजी यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. दरम्यान, ती पतीसोबत फोनवर बोलत असताना जावेद हातात चाकू घेऊन आला आणि रोजीचा गळा चिरला. यात गंभीर जखमी होऊन रोजीचा जागीच मृत्यू झाला.