देशाला हादरून सोडणारी एक घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयातून सहा जणांच्या टोळक्यानं एका महिलेवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यानंतर तिला जिंवत जाळण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातल्या बहबरी परिसरात घडली आहे. सोनितपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मधुरिमा दास यांनी या घटनेबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन जण फरार आहेत. यातील तीन जणांना 24 डिसेंबरला रात्री अटक करण्यात आली तर एकाला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तेजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार संगीता कपि असं मृत पीडित महिलेचं नाव आहे. संगीता ही तीन मुलांची आई होती. ती जादूटोणा करते असा संशय शेजाऱ्यांना होता. याच संशयातून हे हत्याकांड घडलं आहे. सहा जणांच्या टोळक्यानं तिच्यावर आधी धारदार शस्त्रानं हल्ला कोला अन् नंतर तिला जिवंत जाळण्यात आलं. या घटनेबाबत माहिती देताना पीडितेच्या पतीनं सांगितलं की, हल्लेखोरांना संगीता ही चेटकीण असल्याचं संशय होता, तसेच ती जादूटोणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याच संशयातून त्यांनी तिच्यावर हल्ला केला, व त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आलं. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे.