ताज्याघडामोडी

मित्रच बनला वैरी! 60 रुपयांसाठी मित्राची गळा दाबून हत्या

राज्यात रोज हत्येच्या घटना समोर येत राहतात. आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असलेल्या अनेक लहान गोष्टी किती मोठ्या घटनेचं स्वरूप घेऊ शकतात, याचे ज्वलंत उदाहरण आता समोर आलं आहे. यात दोन मित्र आपसात बसून पैशाच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत होते. मात्र याच कारणावरुन वाद झाला आणि शेवटी एकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम बोदा येथे घडली.

आरोपी अल्पेश कुवरलाल पटेल याने मृतक आकाश लक्ष्मण दानवे (वय 21) वर्ष याला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली. यानंतर मृतक तरुणाने सांगितलं, की पैसे सायंकाळी फोन पेने पाठवतो. त्यावर आरोपीला विश्वास बसला नाही, त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की आरोपीने आकाश लक्ष्मण दानवे गळा आवळला. त्यात आकाश हा बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आलं. तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आलं. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आकाशला मृत घोषित केलं. ही घटना बोदा या गावात घडली. दवनीवाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत तरुणाचं शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे बोदा या गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपीला दवनीवाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *