ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वरुणराजाचं पुनरागन झालं आहे. मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर आता मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि गोव्यातील पणजीसह घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, मनमाड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या परिसरात ढगांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *