राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत २४ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी शिक्षक भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केलाशिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकभरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की, शिक्षकभरती प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकाराने दखल घेऊन स्थगिती दिली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठवली असून शिक्षकभरती सुरू झाली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
शिक्षकभरतीसाठी जिल्हा परिषदांनी आपली बिंदुनामावली कायम करून पोर्टलवर जाहिरातीसाठी १५ ते ३१ ऑगस्ट २०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला. उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी १ ते १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुलाखतीसह गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी ११ ते २१ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी २१ ते २४ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.