पाणीपुरी खायला कुणाला आवडत नाही? मात्र पाणीपुरी खाणं जीवावरही बेतू शकते. पाणीपुरीमुळं एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे.पाणीपुरी खाल्यानं नागपुरात तीन तरुणींना गॅस्ट्रोची लागण झाली होती. यातील एका तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, दोघींची प्रकृती चिंताजनक आहे.
मृत मुलगी मुळची जम्मू-काश्मीरची असून ती शिक्षणासाठी नागपूरला आली होती. गॅस्ट्रो झाल्यानंतरही त्यांनी उपचारास दिरंगाई केल्यानं तिघींचीही प्रकृती बिघडली. यात एकीचा मृत्यू झाला असून दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन विद्यार्थीनींवर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. दोन्ही मुली शुद्धीवर आल्यांतर त्यांनी कोणत्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ली होती हे स्पष्ट होणार आहे.
शीतल कुमार असे मृत मुलीचे नाव आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ती बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ती आणि तिच्या दोन मैत्रिणी मेडिकल चौकात एका बंडीवर पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी तिथली दूषित पाणीपुरी खाल्ली आणि त्यांची प्रकृती बिघडली. 5 जुलैला शीतलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेव्हा तिची प्रकृती खुपच बिघडली होती. दूषित पाणीपुरी खाल्ल्यानं तिघींनाही गॅस्ट्रोची बाधा झाली. डॉक्टरांची शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर शीतलचा जीव ते वाचवू शकले नाहीत.